मुंबई,पुणे ३१ : राज्यात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला असून पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने राज्यातील तब्बल ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून, नागरिकांना अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि पुण्याच्या घाट माथ्यावर पुढील २४ तासांसाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
तसेच पुणे शहरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.विदर्भात कोसळणाऱ्या तुफान पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नागपूर शहरातील सखल भागांत पाणी साचले असून नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.रेल्वे वाहतुकीवर फटकामुसळधार पावसाचा मोठा फटका वाहतूक सेवेला बसला आहे.
पुण्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून १४ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. हवामान खात्याचा अंदाज पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते पश्चिमेकडे सरकल्यामुळे हा पाऊस होत आहे. पुढील २४ तास पावसाचा जोर कायम राहील, मात्र उद्यानंतर पावसात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान, उशिरा का होईना झालेल्या या पावसामुळे राज्यातील अनेक धरणे भरली असून पाटबंधारे विभागाने याबाबत समाधान व्यक्त केले आहे!
