Loksabha: लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित; अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधकांचा प्रचंड गोंधळ!
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. सकाळी ११ वाजता राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज सुरू झाले. अधिवेशनाच्या या अंतिम दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेही सभागृहात उपस्थित होते.अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विरोधक पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत आक्रमक झाले होते आणि गोंधळ घालत होते. यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालण्यात अडथळे येत होते, ज्यावर सत्ताधारी पक्षाने नाराजी व्यक्त केली होती. याच मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात तसेच बाहेर आमने-सामने आलेले पाहायला मिळाले.
बुधवारी गृहमंत्री अमित शाह यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते की, सरकार चर्चेसाठी पूर्णपणे तयार असून मी विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी अमित शाह आणि पंतप्रधान मोदी काय भूमिका मांडतात आणि काय उत्तरे देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.मात्र, पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात उपस्थित होताच आणि कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा प्रचंड गोंधळ घातला व घोषणाबाजी सुरू केली. या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना शांतता राखण्याची आणि कामकाज सुरळीत चालवू देण्याची विनंती केली. परंतु विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यामुळे, अखेर काम सुरू झाल्यापासून अवघ्या काही मिनिटांतच अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब स्थगित केले. या अचानक झालेल्या स्थगितीमुळे सर्वांनाच धक्का बसला!
