Thane: बदलत्या ठाण्याचा विकास छायाचित्रातून मांडावा … उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील पत्रकार भवन प्रश्न मार्गी लावणार जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाण्यात छायाचित्र प्रदर्शन!
ठाणे १८ : छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचे चित्रण नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. एखादे चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते. तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो. ठाणं बदलतंय.. ठाण्याचा होत असलेला विकास छायाचित्रकारांनी छायाचित्राच्या माध्यमातून मांडावा असे नमूद करीत छायाचित्रकाराला त्याचा ‘तिसरा डोळा’ सातत्याने उघडा ठेवावा लागतो, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केले. तसेच ठाण्यात पत्रकार भवन उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका व ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महापालिका भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, जयश्री डेव्हिड, एकता भोईर, निर्मला कणसे, दीपक जाधव, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते (अजित पवार) नजीब मुल्ला, नगरसेवक संजय वाघुले, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी छायाचित्रकारांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. आनंदाचा क्षण असो, दु:खाचा प्रसंग असो किंवा एखादी संकटाची परिस्थिती असो, फोटोग्राफर आपल्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी पोहोचून ते क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतो. कोविडच्या कठीण काळातही पत्रकार आणि छायाचित्रकारांनी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचविण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
फोटोग्राफर हा शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होत असतो. एका छायाचित्रातून संपूर्ण घटना किंवा परिस्थिती प्रभावीपणे मांडली जाऊ शकते. मात्र, यासाठी केवळ कॅमेरा हातात असणे पुरेसे नसून योग्य क्षण टिपण्याचे कौशल्य, प्रसंगाचे भान आणि बुद्धीचा योग्य वापर आवश्यक असतो. काही क्षण पुन्हा कधीच परत येत नाहीत. त्यामुळे योग्य वेळी योग्य क्षण टिपणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने उत्कृष्ट फोटोग्राफर ठरतो, असेही शिंदे यांनी सांगितले. एखादे उत्तम छायाचित्र काढण्यासाठी त्यामागे असलेले निरीक्षण, संयम आणि योग्य टायमिंग अत्यंत महत्त्वाचे असते, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार भगिनींनीही उल्लेखनीय छायाचित्रण केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
फोटोग्राफरला चौफेर नजर ठेवावी लागते छायाचित्रामध्ये प्रचंड ताकद असते. फोटोग्राफर हा खऱ्या अर्थाने जागरूक नागरिक असतो. अनेक वेळा एखाद्या प्रसंगाचे छायाचित्र टिपताना फोटोग्राफरला संबंधित व्यक्तींच्या रोषालाही सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीतही तो आपले काम करत राहतो. त्यामुळे समाजाने फोटोग्राफरच्या कामाकडे समजून घेण्याच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.पुढील वर्षी ‘ठाणे बदलतंय’ हा विषय मांडावाठाणे शहराचा झपाट्याने विकास होत असून, शहराचे जुने आणि नवे रूप छायाचित्रांच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणण्याची गरज आहे. पूर्वीचे अरुंद रस्ते आणि आता नव्याने रुंद झालेले रस्ते, बदललेली वाहतूक व्यवस्था, शहरातील वाढत्या सुविधा तसेच ठाण्याच्या विकासाचा प्रवास छायाचित्रांमधून मांडता येऊ शकतो. त्यामुळे पुढील वर्षी आयोजित करण्यात येणारे छायाचित्र प्रदर्शन ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर आयोजित करण्यात यावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जुन्या ठाण्यापासून आधुनिक आणि विकसित ठाण्यापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणल्यास तो एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार संघाची नवनियुक्त कमिटी आणि सर्व छायाचित्रकार यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे महापालिकेच्या शाळांमधील ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शिंदे यांनी केला.चौकट ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात ठाण्यातील गावदेवी मैदानाशेजारील पत्रकार भवनासाठी आरक्षित जागा पत्रकार संघाला द्यावी आणि सुसज्ज भवन उभारावे अशी मागणी केली असता तिला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लागवतो असे आश्वासन दिले. त्यामुळे सुसज्ज आणि आधुनिक सुविधान्नी सज्ज असलेल्या पत्रकार भवनाचा मार्ग मोकळा होणार असा विश्वास दिलीप शिंदे यांनी व्यक्त केला.
