माळशेज घाट मार्ग बंद; पर्यायी रस्त्यावर वाहनांच्या रांगा, हजारो प्रवाशांचा खोळंबा!
Malshej ghat: कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी रस्ता पुन्हा सुरू होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.घाटमार्ग बंद असल्याने वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे. मात्र हा मार्ग अरुंद, एकेरी आणि काही ठिकाणी खराब अवस्थेत असल्याने शनिवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
यामुळे दोन हजारांहून अधिक पर्यटक आणि प्रवासी अनेक तास रस्त्यात अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. माळशेज घाट हा मुंबई, ठाणे, पुणे आणि अहिल्यानगरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने आठवड्याच्या शेवटी वाहनांची गर्दी अधिक वाढते. घाटमार्ग बंद झाल्याने पर्यायी रस्त्यावरही मोठा ताण निर्माण झाला आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय माळशेज घाट परिसरातील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रवास करणे आवश्यक असल्यास वाहतुकीची सद्यस्थिती जाणून घेऊनच नियोजन करावे, तसेच दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे
