नाशिक ०७ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी थेट भाजपला लक्ष्य करत, शिव्या देण्याचा किंवा दुसन्यांच्या आया-बहिणी काढण्याचा अधिकार फक्त भाजपलाच आहे का, असा खडा सवाल उपस्थित केला. याशिवाय नाशिक शहरातील खड्ड्यांच्या समस्येवरून प्रशासनाला धारेवर धरत, शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचा बळी जात असतानाही प्रशासन ढिम्म आहे, त्यांना केवळ कमिशनमध्ये रस असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
नाशिकमधील कंत्राटदारांवर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रात कंत्राटदार उरलेच नाहीत का, अनेक कंत्राटदार गुजरातचेच कसे, असा सवालही त्यांनी केला. राज्यातील विकासकामांवरून आणि निर्णयप्रक्रियेवरून पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात प्रत्येक कामासाठी वरून आदेश येण्याची वाट पाहिली जाते. स्मार्ट सिटी योजनेचे काय झाले आणि शहरे कशी उद्ध्वस्त होत आहेत असा सवाल त्यांनी केला. सध्याच्या निवडणूक पद्धतीला त्यांनी थेट ‘फ्रॉड’ असे संबोधले आणि नाशिकमध्ये झाडांची कत्तल होत असतानाही प्रशासन गप्प असल्याने, तरीही लोक जर भाजपलाच निवडून देणार असतील तर त्यांनी ते भोगावे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
नीटनेच्या पेपरफुटीवर भाष्य करताना त्यांनी खाजगी कोचिंग क्लासेसच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली असून सरकारने यावर स्पष्ट उत्तर देऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित करावे अशी मागणी केली. प्रत्येकाला पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा लागली असून भाजपमध्ये शत्रू संपवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची टीका करत त्यांनी आपल्या या दौऱ्यात विविध मुद्द्यांवरून सरकारला चांगलेच घेरले आहे!
