Birth – Death certificate जन्म -मृत्यू दाखल्यांच्या शुल्कात वाढ: राज्य शासनाचा मोठा निर्णय!
राज्य शासनाने जन्म आणि मृत्यू दाखल्यांच्या शुल्कात वाढ करण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांनुसार संपूर्ण महाराष्ट्रात जन्म किंवा मृत्यू दाखल्याच्या एका प्रतीसाठी आकारण्यात येणारे १० रुपये शुल्क आता दुप्पट करून २० रुपये करण्यात आले आहे. राज्यातील विविध नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रांमध्ये हे सुधारित नवे दर लागू होणार आहेत.हा दरबदल केवळ नियमित दाखल्यापुरता मर्यादित नसून दाखल्याची दुसरी प्रत मिळवणे, विलंबित नोंदणी करणे, जुन्या नोंदींचा शोध घेणे तसेच नावातील दुरुस्ती करणे अशा सर्वच सेवांच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विविध प्रशासकीय कामांसाठी दाखला काढण्यासाठी जाणाऱ्या राज्यातील नागरिकांना आता पूर्वीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. दरम्यान, विलंबित नोंदणीच्या नियमांमध्येही काटेकोरपणा कायम ठेवण्यात आला आहे.
जर जन्म किंवा मृत्यूची नोंद एका वर्षापेक्षा जास्त काळ रखडली असेल, तर त्यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. तसेच दोन वर्षांनंतर नोंद करायची असल्यास थेट न्यायालयाचा आदेश मिळवणे बंधनकारक राहील. या कडक नियमांमुळे विलंब झालेल्या नोंदींसाठी नागरिकांना अतिरिक्त कागदपत्रे आणि प्रशासकीय प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. शासकीय योजना, शैक्षणिक प्रवेश, वारसाहक्क नोंद, मालमत्ता व्यवहार आणि इतर अनेक कामांसाठी जन्म-मृत्यू दाखला अत्यंत आवश्यक असतो. दरवर्षी राज्यभरात लाखो दाखले जारी केले जात असल्याने, या शुल्कवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे!
