Delhi: राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची स्वातंत्र्यदिन सोहळ्याला दांडी!
दिल्ली १५ : दिल्लीतील लाल किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अधिकृत कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्रालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना रीतसर निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, निमंत्रण असूनही या दोन्ही प्रमुख नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवत अनुपस्थित राहणे पसंत केले.या गैरहजेरीमागे २०२४ मधील आसनव्यवस्थेचा वाद आणि नाराजी हे मुख्य कारण मानले जात आहे. २०२४ च्या सोहळ्यात राहुल गांधी यांना मागे म्हणजेच ५ व्या रांगेत बसवण्यात आल्याने त्यांनी व काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून ते या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आहेत.
त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी उपस्थित राहणार का, याविषयी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि उत्सुकता होती. मात्र, सर्व चर्चांनंतरही त्यांनी यंदाही या सोहळ्याला दांडी मारणेच पसंत केले, ज्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून आता त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.दरम्यान, या सोहळ्यातील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. देशात विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला जात असून, भारतात लोकशाही आणि मार्गदर्शन करणारे संविधान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच देशाच्या हिताचा विचार न करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत त्यांनी युवकांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि नीट पेपरफुटीच्या मुद्द्यासह खासगी कोचिंग क्लासेसवरही आपले वक्तव्य केले!
