Maharashtra politics : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
ताज्या बातम्या राजकारण

Maharashtra politics : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

Aug 23, 2026

Ncp २३ : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा मोठा वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याबाबतच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या असून, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या बैठकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर गांभीर्याने चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, पक्षाची आगामी काळातील अधिकृत राजकीय भूमिका काय असेल, यावरही निर्णय घेतला जाणार आहे.या राजकीय घडामोडींमागे दोन दिवसांपूर्वी पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राज्य तसेच केंद्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार अधिक आक्रमक झाले असून त्यांनी पक्षांतर्गत बैठकांचा धडाकाच लावला. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली. या घडामोडींनंतर लगेचच शरद पवारांनी आपल्या गटातील कोअर कमिटीची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या बातमीमुळे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांवरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून या चर्चा फेटाळण्यात आल्यामुळे केवळ आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण पाहायला मिळाले होते. शरद पवार गट भाजपसोबत जाणार किंवा महाविकास आघाडीसोबतच युती कायम ठेवणार, अशा अनेक शक्यतांवर राजकीय चर्चा रंगल्या होत्या.

शरद पवार एनडीएत सामील होणार असल्याच्या चर्चाही मध्यंतरी सुरू होत्या, मात्र शरद पवारांनी या सर्व चर्चा वेळोवेळी ठामपणे फेटाळून लावल्या होत्या.त्याच वेळी जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांची भेट, तसेच शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेली भेट यामुळे राजकीय वातावरणात तर्कवितर्कांना उधाण आले होते. या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा नक्की झाल्याचे सूत्रांचे म्हणणे असले, तरी अद्याप त्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. आता महिनाअखेरीस होणाऱ्या या कोअर कमिटीच्या बैठकीत विलिनीकरणाबाबत काय ठोस निर्णय होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *