Manoj jarange: मनोज जरांगे आंदोलनावर ठाम…आधी आंतरवाली सराटी एल्गार, नंतर चलो मुंबईचा नारा; संपूर्ण आंदोलनाचा प्लान सांगितला!
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते उपोषणावर ठाम आहेत. उद्यापासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आधी आंतरवाली सराटीमध्ये ते एल्गार करणार, त्यानंतर ‘चलो मुंबई’चा नारा देणार आहेत. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. त्याचसोबत त्यांनी त्यांच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला.
मनोज जरांगे यांनी आंदोलनाबद्दल सांगितले की, ‘आंदोलन आंतरवाली सराटीतच होईल. मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला जाणार आहोत. मी उपोषणावरती ठाम आहे मरेपर्यंत उठत नाही. मराठा समाजाने मुंबईकडे घेऊन जायचं.’ यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दोन टप्प्यात तयार राहायचं आहे असे सांगितले.
प्रमाणपत्र रद्द केल्यावरून मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘आमचं वाटोळं केलं सरकारने. सोनवणेच्या पोरीचं वाटोळं झालं आणि फडणवीस-शिंदेंनी तळतळाट घेतला. कोणत्याही पोरांनी आत्महत्या करू नये मी त्यांचा बाप बसलो आहे इथे. यांनी प्रमाणपत्र दिले नाही तर मी बघतो यांना. पण एकाही पोराने प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून आत्महत्या करू नये. आताच संधी आहे घरात बसू नका. मराठ्यांनी आता जागं व्हावं.’
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर बोलताना जरांगे यांनी, ‘एखाद्या वेळेस सरकार इंटरनेट बंद करू शकतं. देवेंद्र फडणवीस यांनी लय पोलिस आणलेत कुस्ती खेळायची आहे का?’, असा सवाल केला आहे.
मनोज जरांगे यांनी यावेळी विखे-पाटलांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, ‘विखे-पाटलांकडून खूप अपेक्षा होती आम्हाला. विखे पाटील म्हणाले की लोकांनी अर्ज दिले नाही. मराठा समाजाने अर्ज दिलेले आहेत. हे खोटं बोलतात. मराठा समाजात उदासीनता आहे असं म्हणतात तर मग करोडोने लोक एकत्र येतात कसं काय? देवेंद्र फडणवीस सांगेल तसं विखे बोलायला लागले. फडणवीस-शिंदेचं ऐकून विखे पाटलांनी मराठ्यांचे वाटोळं करू नये. विखे पाटलांना काहीच कळत नाही. त्यांना फक्त कारखाना कळतो!
