Nitesh Rane :आपण सगळे हिंदू आहोत, मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी का होत नाही?, नितेश राणेंचा सवाल!
नितेश राणे १५ : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली असून, औरंगाबादचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव बदलून ‘धाराशिव’ करण्यात आले आहे. तसेच काही शहरांची नावेही बदलण्यात आली आहेत. आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या उपनगराचे नाव बदलून ‘मुंब्रादेवी’ ठेवण्याबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू असून, याच संदर्भात बोलताना भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीतील तिरंगा यात्रेत सहभागी झाल्यानंतर भाष्य केले. ते म्हणाले की, “पहिले आपण सगळे हिंदूच होतो, परत हिंदूमय करण्याचे काम आम्ही लोक करत आहोत.
” जसे इस्लामपूरचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्यात आले, तसेच मुंब्र्याचे मुंब्रादेवी असे नामकरण का होऊ नये, असा सवाल करत त्यांनी या संदर्भातील नाव लवकरच जाहीर होईल असे संकेत दिले. त्यामुळे मुंब्र्याच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.यासोबतच त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना महाविकास आघाडी तसेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर राणे यांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर थेट निशाणा साधत आरोप केला की, त्यांच्या खात्यात काही “सडके आंबे” असून ते चुकीचे परवाने देतात, ज्यामुळे सरकारची बदनामी होते. मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेला मुद्दा चुकीचा नसून योग्य होता आणि जात पडताळणीच्या प्रक्रियेत काही मराठा तरुणांना डावलले गेले हा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, या प्रकरणासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदार धरणे योग्य नसल्याचे सांगत हा प्रकार खालच्या पातळीवरील काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाल्याचा दावा त्यांनी केला.तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधताना राणे यांनी काँग्रेसच्या सध्याच्या राजकीय स्थितीसाठी त्यांनाच जबाबदार धरले. चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आणि त्याच कारणामुळे काँग्रेस आजही विरोधी पक्षात असल्याचा दावा करत, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा अधिकार पृथ्वीराज चव्हाण यांनी गमावला असल्याचे राणे म्हणाले. याशिवाय, निवडणूक आयोगासंदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी राऊतांवर जोरदार टीका केली. “हा काय तिथे चहा पाजायला होता का?” असा सवाल करत त्यांनी निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. देशात संविधान, कायदे आणि नियम असून भारत हा लोकशाही मानणारा देश असल्याचे राणे यांनी नमूद केले!
