Thane:’शुद्धीकरण’ नव्हे, ही जातीय मानसिकता..ठाणे काँग्रेसचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; खरगेंच्या सभास्थळाच्या कथित शुद्धीकरणाविरोधात सत्याग्रह; राहुल पिंगळेंचा जातीय मानसिकतेविरोधात इशारा!
ठाणे १४ : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्दवानी येथील सभेनंतर सभास्थळाचे गंगाजल शिंपडून कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या घटनेच्या माध्यमातून जातीयवादी आणि प्रतिगामी मानसिकता समोर आल्याचा आरोप काँग्रेसने केला.ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली. मनुवादी विचारसरणीचा धिक्कार असो… ‘पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद चालणार नाही… अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा महाराष्ट्र जातीय भेदभाव कधीही स्वीकारणार नाही.
सार्वजनिक व्यासपीठाचे कथित शुद्धीकरण हा संविधानातील समानतेच्या मूल्यांचा अपमान आहे. अशा प्रतिगामी प्रवृत्तींविरोधात काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असा इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिला.काँग्रेसने यावेळी भाजपवरही जोरदार टीका केली. एकीकडे ‘सबका साथ, सबका विकास’ आणि हिंदू एकतेची भाषा केली जाते, तर दुसरीकडे दलित नेत्याच्या उपस्थितीनंतर सभास्थळाचे कथित शुद्धीकरण केले जाते, ही विसंगती असल्याचा आरोप काँग्रेसने केला. प्रभू श्रीरामांनी शबरीची बोरे स्वीकारून दिलेला समतेचा संदेश लक्षात घेता, धर्माच्या नावावर भेदभाव करणे ही सनातन मूल्यांचीच अवहेलना असल्याचे काँग्रेसने म्हटले.
२१व्या शतकातही जात-पात आणि अस्पृश्यतेच्या मानसिकतेला खतपाणी घालण्याचे प्रकार होत असतील, तर त्याविरोधात आवाज उठवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी,प्रदेश सदस्य, महिला,युवक,सेवादल सह विविध सेल चे पदाधिकारी तसेच ब्लॉक अध्यक्षांसह सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते. पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादाला थारा दिला जाणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला!
