Thane: अथक प्रयत्नांना यश; मुंबई-III जलवाहिनीची गळती अखेर दुरुस्त!
ठाणे १६ : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीला आढळलेली गळती बंद करण्याचे काम शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाले आहे. जलवाहिनी भारीत (Charged) झाल्यानंतर म्हणजेच रात्री ९ वाजेपासून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होणार होते. मुंबई-III जलवाहिनीला गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री गळती आढळली. महानगरपालिका जल कार्य (नगरबाह्य) विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून जलवाहिनीवरील छिद्र लाकडी खुंटी बसवून बंद केले.
दरम्यानच्या कालावधीत क्षतिग्रस्त जलवाहिनीच्या भागाभोवतीचा परिसर खोदकाम करून उघडण्यात आला. तेथील साचलेले पाणी उपसून परिसर कोरडा करण्यात आला. खराब झालेल्या भागावर मृदू पोलाद (MS) पॅच प्लेट बसवून ती वेल्डिंगद्वारे कायमस्वरूपी दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री जलवाहिनीला पुन्हा एकदा गळती लागली. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे दुरुस्ती कार्यवाहीत अडथळे निर्माण झाले. परिणामी, शहर व पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा प्रभावित झाला.
अखेरीस, पिसे उदंचन केंद्र व पांजरापूर जल शुद्धीकरण प्रकल्प यांच्यासमवेत समन्वय साधून पाणीपुरवठ्यावर नियंत्रण आणण्यात आले. क्षतिग्रस्त दाबयुक्त जलवाहिनीची सुरक्षितपणे दुरुस्ती करण्यात आली. जल कार्य (नगरबाह्य) विभागाचे अभियंते आणि कर्मचारी यांच्या मुळे गळती दुरुस्ती कार्यवाही सायंकाळी पाच वाजता युद्धपातळीवर पूर्ण केली आहे.
