Ganpati festival : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी…मुंबईत बेस्ट बस आणि मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास, वेळापत्रक पाहा!
गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने विशेष नियोजन केले आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रमुख गणेश मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या रात्रभर धावणार आहेत.लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी यांसह दक्षिण मुंबईतील प्रमुख विभागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
१४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत एकूण १० बसमार्गांवर २६ जादा बसगाड्यांची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बससेवेचा लाभ गणेशभक्तांना रात्री साडेदहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांना तसेच विसर्जनासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जादा बसगाड्यांची व्यवस्था…
ओशिवरा, शिवाजीनगर, देवनार, बॅकबे, मुंबई सेंट्रल, वरळी, सांताक्रुझ, वडाळा आणि काळा किल्ला या आगारांमार्फत करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील गर्दीच्या भागांसोबतच पश्चिम उपनगरीतील गणेशभक्तांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध राहणार आहे. ओशिवरा आणि सांताक्रुझपर्यंत जादा बसगाड्या धावणार असल्याने रात्रीच्या वेळी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
मेट्रो-३ ॲक्वा लाइन करता येणार रात्री उशिरापर्यंत प्रवास…
बेस्ट बससोबतच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो-३ अर्थात ॲक्वा लाइनची सेवा १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कफ परेड आणि आरे जे.व्ही.एल.आर. या दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता निघते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गणपती बाप्पाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांना परतीच्या प्रवासासाठी मेट्रोचा देखील पर्याय उपलब्ध राहणार आहे!
