Uddhav Thackeray: सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि राजकीय घडामोडी: पंतप्रधान-खासदार भेटीवरून उद्धव ठाकरेंचे गंभीर आरोप!
Shivsena: शिवसेना नक्की कोणाची? यावर सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फुटीर खासदारांची भेट झाल्याचे समोर आले आहे. या भेटीवर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.सुनावणी सुरू असताना झालेल्या या भेटीच्या कार्यक्रमामुळे न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे आता देशातील लोकशाही वाचवण्याची अंतिम जबाबदारी जनतेचीच आहे, असे थेट आवाहन त्यांनी केले आहे. या भेटीनंतर खासदार संजय राऊत यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली, ज्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “एकनाथ शिंदे आधी अमित शहा यांना भेटायचे आणि आता ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटत आहेत. अमित शहा मुंबईत असतानाही ते पंतप्रधानांना भेटतात. ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा धमकीवजा संदेश मोदींनी नक्की कोणाला दिला आहे? अमित शहांना, न्यायालयाला की देवेंद्र फडणवीस यांना? न्यायालयाने या प्रकाराची आणि पेपरच्या कात्रणांची गंभीर दखल घेतली पाहिजे. सध्या देशात विशिष्ट वातावरण निर्मिती केली जात आहे.” पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, “ही लढाई केवळ शिवसेनेपुरती मर्यादित नसून ‘गद्दारीचा व्हायरस’ आता देशभर पसरत आहे.
पंतप्रधान मोदींनी इतर पक्षांतील फुटीरांनाही ‘आमच्याकडे या, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, मी तुमच्या पाठीशी आहे’ असाच संदेश दिला आहे का? मग पीएम मोदींची ही धमकी नेमकी कोणासाठी होती अमित शहा, फडणवीस की न्यायालयासाठी याचा खुलासा झालाच पाहिजे.”शेवटी जनतेला आवाहन करताना ठाकरे यांनी स्पष्ट केले की, देशात पसरणाऱ्या या गद्दारीच्या व्हायरस विरोधात प्रत्येकाने लोकशाहीसाठी लढले पाहिजे. आज देशातील तरुणांचे डोके भडकले असून, सत्ताधारी कितीही प्रयत्न करत असले तरी तरुण आता ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. मोदींचे हे पाऊल अत्यंत गंभीर असून आम्ही हे सर्व न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहोत. गद्दारांना नक्की कोणाची भीती वाटतेय हे समोर आले पाहिजे आणि माझ्या मनातील या सर्व शंका व्यक्त करण्यासाठीच मी वाचा फोडत आहे.
