Thane: स्पर्धा नाही… परंपरा, संस्कार आणि उत्साहाचा वारसा…नवयुग मित्र मंडळाच्या दहीहंडी महोत्सवाचे २२ वे वर्ष; गोविंदा पथकांमध्ये उत्साह!
ठाणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ (रजि.) आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने यंदाही भव्य दहीहंडी महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेल्या या दहीहंडी महोत्सवाने यंदा २२ व्या वर्षात पदार्पण केले आहे.स्नेहा आंब्रे आणि डॉ. सागर आंब्रे यांच्या आयोजनातून होणाऱ्या या दहीहंडी महोत्सवात परंपरा, संस्कार आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळणार आहे. टिकुजीनी वाडी रोड, कोठारी कम्पाऊंड, २७ एकरसमोर, चितळसर-मानपाडा परिसरात होणाऱ्या या सोहळ्यात ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांचा उत्साहवर्धक सहभाग राहणार आहे.
यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘मानाची दहीहंडी’. ही दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपये रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.दहीहंडीच्या थरारासोबतच नागरिकांसाठी मराठी आणि हिंदी लोकनृत्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पारंपरिक उत्सवाबरोबरच मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.निवृत्त सैनिकांचा विशेष सन्माननवयुग मित्र मंडळाच्या वतीने यंदा ठाणे जिल्हा सैनिक फेडरेशनमधील निवृत्त सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
देशसेवेसाठी योगदान दिलेल्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.सन्मानार्थींमध्ये कप्तान शंकर कदम, सुभेदार प्रमोद शिंदे, हवालदार राजू पाटील, हवालदार निलेश पाटील, हवालदार संभाजी दुधाडे, हवालदार जयदीप भोईर, हवालदार अंकुश साळुंखे आणि हवालदार ध्यानसिंग आहिरे यांचा समावेश आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ दहीहंडी उत्सवाची परंपरा जपणाऱ्या नवयुग मित्र मंडळाने यंदाही सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक उपक्रमांची सांगड घातली आहे. त्यामुळे २२ व्या दहीहंडी महोत्सवाकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.स्नेहा आंब्रे आणि डॉ. सागर आंब्रे यांनी नागरिकांनी तसेच ठाणे-मुंबईतील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दहीहंडी महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे!
