Thane: रेल्वेलगतच्या बांदल चाळीचे आधी पुनर्वसन, नंतर निष्कासन..आमदार संजय केळकर यांची यशस्वी मध्यस्थी!
ठाणे २० : नियोजित नवीन रेल्वे स्थानक उभारणीत बाधित होणाऱ्या बांदल चाळीतील कुटुंबांचे आधी पुनर्वसन करून नंतरच चाळीचे निष्कासन करण्यात येईल, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री.मीना यांनी मान्य केल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.ठाणे रेल्वे स्थानकालगत गेल्या ६० वर्षांपासून बांदल चाळ असून येथे ५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. सध्या नवीन विस्तारीत रेल्वे स्थानकाच्या हालचाली सुरू असून त्यात ही चाळ बाधित होणार असून रेल्वे प्रशासनाने या कुटुंबांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे रहिवासी हवालदिल झाले होते.
त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती.आ. केळकर यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आज त्यांनी रहिवाशांना घेऊन विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. मीना आणि अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन रहिवाशांची बाजू मांडली होती. आधी कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करा, त्यानंतरच चाळीचे निष्कासन करा अशी मागणी श्री.केळकर यांनी केली. श्री. मीना यांनी ही मागणी केली असून रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. रहिवाशांनी श्री. केळकर यांचे आभार मानले आहेत!
